आला पहिला पाऊस
धरा झाली चिंब ओली
कोणा सुचली कविता
कोणी लिहीली चारोळी
कोणी प्रेमी झाडामागे
होते झालेले बेभान
तिचे ओलेते सौंदर्य
आज आले मोहरून
तापलेली वसुंधरा
शांत थंड झाली थोडी
नभातूनी बरसली
धार अमृताची गोडी
आली निश्चिंती निवांत
आता भरतील तळी
अशी फुलली म्हणोनी
जनसामान्याची कळी
तरी जीवा नाही थारा
आहे घोर परी चिंता
कशी उडालेली दैना
एक सर येता येता
त्रेधा चालताना पाय
खड्डयांत अडखळती
कुठे पाण्यांची डबकी
कधी भिंती कोसळती
कशी ट्रेन लेट आली
कुठे रुळ उतरले
आणि सबवेत पाणी
उगा ट्राफिक फसले
तो आहे "मुंबईकर"
नाही नशिबी सुटका
ऊन असो की पाऊस
त्याला सदैव फटका
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर
Wednesday, June 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
chan mast kepp it up!
ReplyDelete